देशातील विमानतळांची संख्या २०१४ पासून दुप्पट झाल्याची नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची माहिती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील विमानतळांची संख्या २०१४ मधील ७४ वरून आता १४८ पर्यंत म्हणजेच जवळपास दुप्पट झाली असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. ते काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या विमान वाहतुकीसंदर्भातील शिखर परिषदेत बोलत होते. २०१४ ते २०२० सालापर्यंत देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येतही वाढ झाल्याचं नमूद करत, २०२४ सालात प्रवासी संख्या सुमारे १४ कोटी होईल असं ते म्हणाले.

देशांतर्गत विमान वाहतुकीत, जागतिक पातळीवर, आसन क्षमतेच्या बाबतीत, भारत तिसर्‍या स्थानावर असून, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत १८व्या स्थानावर आहे. विमान वाहतुकीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात, येत असलेले अडथळे दूर करून ती अधिक सक्षम आणि सुलभ करण्यासाठी  सरकार जलद गतीने पावलं उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं.