अवकाळी पाऊस झालेल्या भागात पंचनामे करण्याचे आदेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता संबधित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) च्या निकषांच्या दुप्पटीने नुकसानभरपाई दिली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळोवेळी शासनाने दिली आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.