देशातल्या युवकांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण रुजवण्यात एनसीसीचं योगदान आदर्शवत आहे - जनरल अनिल चौहान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातल्या युवकांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण रुजवण्यात एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचं योगदान आदर्शवत आहे, असं संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नवी दिल्ली इथं करिअप्पा संचलन मैदानावर एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्र उभारणीत तसंच लोकांमध्ये सामाजिक जनजागृती करण्यामध्ये एनसीसीनं दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, देशातल्या सागर किनाऱ्यावर प्लास्टीकचा कचरा हटवून त्याचं रिसायकलिंग करण्यासाठी पुनीत सागर अभियान सुरू केलं आहे.

या अभियानात आतापर्यंत १३ लाख छात्र सैनिकांनी भाग घेतला असून सुमारे २०८ टन प्लास्टीक कचरा गोळा केला आहे. त्यापैकी १६७ टन प्लास्टीक रिसायकलिंगसाठी पाठवलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये छात्र सैनिकांनी केलेल्या चमकदार कामगिरीचं त्यांनी कौतूक केलं.