परकीय योगदान नियमन कायदा उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा अमित शहा यांचा आरोप

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजीव गांधी फाऊंडेशनद्वारे परकीय योगदान नियमन कायदा,अर्थात एफसीआरएच्या उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला.

संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, फाऊंडेशनला २००५-२००७ दरम्यान चिनी दूतावासाकडून १ कोटी ३५ लाख रुपयांचं मिळालेलं अनुदान हे एफसीआरएच्या नियमांचं उल्लंघन करणारं होतं.

शहा म्हणाले की शासनानं नियमानुसार राजीव गांधी फाऊंडेशनची नोंदणी रद्द केली आहे. ते म्हणाले, लोकसभेत त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता पण काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी कामकाजात व्यत्यय आणला.