भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात आला. यामुळं शून्य आयात शुल्कावर भारतीय वस्तूंना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत प्रवेश मिळेल. यामुळे देशात आणखी १० लाख जणांना रोजगार मिळेल अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

२ एप्रिल रोजी या करारावर भारताने ऑस्ट्रेलियासोबत सही केली होती. अतिशय वेगात या कराराच्या चर्चा झाल्याची माहिती गोयल यांनी आज मुंबईत वार्ताहरांना दिली. देशातल्या दागदागिने, वस्त्र, चामडे, पादत्राणे, फर्निचर, खाद्य आणि कृषी उद्योगासह इतर उद्योगांना या कराराचा विशेष फायदा होईल. या कराराअंतर्गत ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या कच्च्या मालाला भारतात प्राधान्यानं प्रवेश मिळेल.या करारामुळं देशातले योग शिक्षक आणि आचाऱ्यांना विसामध्ये वार्षिक कोटा मिळेल. १ लाख विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर कामासाठी विसा मिळेल. या करारामुळं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सेवांवर होणारी दुहेरी कर आकारणी वाचणार आहे, असं गोयल म्हणाले.  

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, या करारामुळं दोन्ही देशातल्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. या मुळं दोन्ही देशांतल्या व्यवसायांना चालना मिळेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानीझ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. यामुळं ऑस्ट्रेलियातल्या व्यावसायिकांना नव्या संधी मिळतील, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरुन व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासोबत मार्चमध्ये भारताला भेट देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.