जागतिक अनिश्चिततेच्या स्थितीत भारत आशेचा किरण असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेने आपला विकास वेग कायम राखला असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं आहे. या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारत हा आशेचा किरण असल्याचे गौरवोद्गार आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी काढले.

वॉशिंग्टनमध्ये आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलत होत्या.जी-ट्वेंटी देशाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याच्या काही दिवसांपूर्वी भारताकडून असलेल्या अपेक्षांवर विचारलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या.त्या म्हणाल्या, सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताचा विकास हा संरचनात्मक सुधारणांवर आधारित आहे.