नैसर्गिक शेती म्हणजेच पृथ्वीची सेवा आणि त्यासोबतच जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादकतेचं रक्षण करण्याचं काम असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभराची सकस आणि पौष्टिक खाद्यान्नाची मागणी पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक शेतीची आवश्यकता लक्षात घेतली, तर आर्थिक समृद्धीचा मार्ग नैसर्गिक शेतीच्या प्रक्रियेतून जातो हे समजून घेतला येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

गुजरातमधल्या सुरत इथं आयोजित, नैसर्गिक शेतीवरच्या परिषदेत प्रधानमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. नैसर्गिक शेती करणं, म्हणजेच पृथ्वीची सेवा करणं, आणि त्यासोबतच जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादकतेचं रक्षण करण्याचं काम आहे, असं त्यांनी सांगितलं.

भारत हा नैसर्गिकदृष्ट्या आणि संस्कृतीनं कृषीप्रधान देश आहे. आपली जीवपद्धती, आरोग्य आणि समाज हा इथल्या कृषी व्यवस्थेचा पाया आहे, त्यामुळेच देशाच्या प्रगतीसाठी शेतकरी आणि कृषी क्षेत्राची प्रगती आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलं. डिजिटल इंडिया अभियानाला मिळालेलं यश म्हणजे गावांमध्ये बदल घडवून आणणं सोपं नाही असं म्हणणाऱ्यांना गावांनी दिलेलं उत्तर आहे असं ते म्हणाले.