पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातली वाळू आणि गाळ काढण्यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पावसामुळे वारंवार येणा-या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील गडचिरोली,वर्धा,यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. राज्यातील पूरग्रस्त भागात आपत्ती विषयक मदत आणि बचाव कार्यासाठी असलेल्या यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर कार्यरत आहेत.त्याचा आढावा मी घेत असून, पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजार पसरू नये म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तात्काळ खबरदारी घ्यावी. नद्यांची पात्रे गाळ साचल्यामुळे उथळ झाली आहेत. पात्रांचे खोलीकरण व रूंदीकरण केल्यानं नद्यांचे प्रवाह पूर्ववत होण्यासाठी मदत होईल यासाठी जलसंपदा विभागाने नदया तसंचं धरणातील गाळ काढण्याबाबत योग्य ती कायमस्वरूपी  उपाययोजना कराव्या असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

ज्या नागरिकांचा मृत्यू ओढवला त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत वितरीत झाली आहे तरीही जे लोक या आपत्तीत जखमी असून उपचार घेत आहेत त्यांना तात्काळ आरोग्य सेवा मिळायला हव्यात. पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून त्याचा प्रस्ताव शासनाला सादर करा. कोणताही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी.

राज्यात पावसामुळे झालेल्या १०९ मृत्यू पैकी साठ टक्के मृत्यू हे वीज पडून झालेले आहेत. त्यामुळे पावसाळयात अंगावर वीज पडून मृत्यू होवू नयेत यासाठी वीज अटकाव यंत्रणा ही देखील प्रभावीपणे राबविण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मदत व पुनर्वसन विभागाने काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केल्या.