चेन्नई इथं सुरु होणाऱ्या ४४ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईच्या जेएलएन इनडोअर स्टेडियममध्ये आजपासून ४४ वं बुद्धिबळ ऑलिंपियाड सुरू होत आहे. आज संध्याकाळी एका दिमाखदार सोहोळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या स्पर्धेचं उदघाटन करतील. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यावेळी उपस्थित राहतील.

२८ जुलै ते ९ ऑगस्ट २०२२ या दिवसांमध्ये होणाऱ्या या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये १८७ देश सहभागी होत असून कुठल्याही बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा सहभाग असेल. भारत देखील ६ संघांमधल्या ३० खेळाडूंसह आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ स्पर्धेत उतरवत आहे. १९२७ पासून आयोजित करण्यात येत असलेली ही प्रतिष्ठेची स्पर्धा भारतात प्रथमच तर आशिया खंडात ३० वर्षांनंतर आयोजित केली जात आहे.