राज्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम येत्या १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवला जाणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम येत्या १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवला जाणार आहे. यासंदर्भात मुख्य सचिवांनी सर्व मंत्रालयीन विभाग, आणि त्यांच्या अधिपत्याखालच्या क्षेत्रिय कार्यालयांसाठी सर्वसाधारण सूचना जारी केल्या आहेत.

‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसार, प्रचार आणि जाणीव जागृती मोहिमेसाठी सांस्कृतिक कार्य विभागानं जिंगल, गीतं, ध्वनीचित्रफित, जाहिराती, लघु चित्रपट, सेलिब्रिटीच्या माध्यमातून आवाहन, पोस्टर इत्यादींची निर्मिती केली आहे. ती शासनाच्या https://mahaamrut.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर याबाबतची माहिती कोणत्याही विभागाला, नागरिकाला उपलब्ध होऊ शकते. त्याचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा. याबाबतचं शासन परिपत्रक पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं जारी केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, शाळा- महाविद्यालयं, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्त भाव धान्य दुकानं, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन बाबींशी निगडीत यंत्रणांद्वारे ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्याचं आवाहन शासनानं केलं आहे.