पंडित दीनदयाळ ऊपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार ग्रामपंचायतींना जाहीर

 


मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित पंडित दीनदयाळ ऊपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातल्या भंडारवाडी ग्रामपंचायतीला गौरव ग्रामसभा पुरस्कार जाहीर झाला. या ग्रामपंचायतीनं २०२०-२१ या वर्षात ग्रामसभा, वार्डसभा, महिला ग्रामसभा, वार्षिक ठराव, ग्रामपंचायत अभीलेखांचं अद्यावतीकरण या बाबतीत केलेल्या कामगीरीसाठी हा पुरस्कार मिळाला. बावी, खानापूर, धारूर या तीन ग्रामपंचायतींना पंडित दिनदयाळ ऊपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. या तीनही ग्रामपंचायतींनी सर्व ग्रामसभा तसंच ग्रामपंचायतीच्या इतर कामांचं केलेलं संगणकीकरण, यासोबतच कर वसुली, अभिलेखांचं अद्ययावतीकरण, सरकारी योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यानं, पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार मिळाल्यानं आता या ग्रामपंचायतींना मार्गदर्शक ग्रामपंचायतींचा दर्जा दिला जाणार आहे. येत्या २३ एप्रिलला पंचायतराज दिनाच्या दिवशी पुरस्कारांचं वितरण होणार असल्याचं जिल्हा परिषदेनं कळवलं आहे.