अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग निंदा नालस्तीसाठी होऊ नये - दामोदर मावजो

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या उपयोग कोणाची निंदा नालस्ती करण्यासाठी होऊ नये असं मत ज्ञानपीठ विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी व्यक्त केलं. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं ९५ वाव्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पुढील साहित्य संमेलन गोव्यात भरवावं, कोकणी माणूस त्याला प्रतिसाद देईल असं मावजो म्हणाले. नव्या साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वाणवा जाणवत असून, संशोधनात्मक लेखन वाचकांपर्यंत पोहोचण्याची गरज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

साहित्य महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षांतून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी, अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली. ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर आजकाल काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून, साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावं, असंही पवार यांनी नमूद केलं.

मराठी भाषा बोलणारे देशात दुसऱ्या आणि जगात १०व्या क्रमांकावर असल्याचं मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं. तसंच साहित्य संमेलन इतर राज्यात व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

९६ वावं साहित्य संमेलन होण्यापूर्वी केंद्राने मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे अशी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी केली. ग्रंथदिंडीने या संमेलनाला प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीत उदगीर शहर आणि तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विविध पोशाखात सहभागी झाले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनं तयार केलेल्या चित्ररथानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. तीन किलोमीटर अंतराच्या या ग्रंथदिंडीत महिलांची दुचाकी फेरी तसंच विविध पोशाखातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या ग्रंथदिंडीवर प्रत्येक चौकात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.