भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम ; लाभार्थी  शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन

 

पुणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे सामाजिक न्याय भवन येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील सहायक संचालक लेखा व वित्त मारुती मुळे, समाज कल्याण अधिकारी मीना अंबाडेकर,  सहायक आयुक्त संगीता डावखर, डॉ.गौतम बंगाळे, मल्लिनाथ हरसुरे, दिपाली ढोरजे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.बंगाळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तर श्री.शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्यावर व्याख्यान दिले.

गणेश केळगंद्रे या विद्यार्थ्याने ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक विचार’ या विषयावर विचार व्यक्त केले, तर मनोज भोईवार याने बासरी वादनाद्वारे भीमगिते सादर केली. प्रास्ताविकात श्रीमती डावखर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेची माहिती दिली. त्यांच्या हस्ते ‘पुणे विद्यापीठाच्या नामकरणाचा प्रेरणादायी इतिहास’ आणि  ‘बाबासाहेबांची पत्रकारिता’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.