राज्यात अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून प्राथमिक अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानंतर आज राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास तसेच क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील विविध गारपीटग्रस्त भागात जाऊन आढावा घेतला. नागपूर जिल्ह्यात जवळपास ७ हजार ४३१ हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस, गहू, हरभरा, तूर, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले असून तब्बल ८ हजार ३३४ खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान झाले आहे. तर भाजीपाला पिकांचंदेखील मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. सावनेर, कामठी, पारशिवनी, रामटेक,  तालुक्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बोर व आवळ्याच्या आकाराची गारपीट काही भागात झाली. मंगळवारी तासभर गारपीट झाली. दरम्यान,  पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी आज नागपूर जिल्ह्यातील बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी तालुक्यातील गुमती, लोणखेरी, खापा, सावनेर तालुक्यातील दहेगाव,  पारशिवनी तालुक्यातील इटगाव, भागीमहारी , रामटेक तालुक्यातील जमुनिया, टुपार, घोटी, फुलझरी आदी गावांना भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेतला आणि राज्य शासनातर्फे तात्काळ मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल असंआश्वासित केलं.