देशाच्या भरभराटासाठी भारतीय स्टार्ट अप कंपन्यांचं योगदान महत्त्वपूर्ण असेल - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील त्यावेळी देशाच्या भरभराटासाठी भारतीय स्टार्ट अप कंपन्यांचं योगदान महत्त्वपूर्ण असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज भारतीय स्टार्टअप कंपन्यांबरोबर दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. चालू वर्ष भारतीय स्टार्टअप कंपन्यांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले. कृषी, आरोग्य, अवकाश, उद्योग, सुरक्षा, वित्त तंत्रज्ञान आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्या या संवादात सहभागी झाल्या होत्या. दीडशेहून अधिक कंपन्यांची सहा कार्यकारी गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक गटानं प्रधानामंत्र्यांसमोर सादरीकरण केलं. दरवर्षी १६ जानेवारीला स्टार्टअप दिवस साजरा केला जातो. देशाच्या जडणघडणीत स्टार्टअप्सनी आपल्या नवनवीन संकल्पनांच्या आधारे योगदान द्यावं हा या संवादामागचा उद्देश आहे. मिलेनिअम मार्केटच्या आधारे भारत आज आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होत आहे. युवकांच्या प्रयत्नांना पूर्ण मदत करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे, असंही मोदी म्हणाले.