दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून केप टाऊन इथं सुरू झाला आहे. भारतानं नाणेफेक जिंकून सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या २ बाद ३३ धावा झाल्या होत्या. के. एल. राहुल १२ धावांवर आणि मयंक अग्रवाल १५ धावांवर बाद झाला. या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरूस्त असू्न आजचा सामना खेळणार आहे, असं विराट कोहलीनं काल वार्ताहर परिषदेत सांगितलं होतं. दुसऱ्या सामन्याला तो पाठदुखीमुळे मुकला होता. जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज मात्र दुखापतीमुळे खेळू शकणार नाही असं कोहली म्हणाला. या मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळं मालिका विजयासाठी दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील.