नैसर्गिक शेतीमुळे कृषी क्षेत्रात कायापालट घडून येईल, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विश्वास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैसर्गिक शेतीमुळे कृषी क्षेत्रात कायापालट घडून येईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज गुजरातमधे आणंद इथं नैसर्गिक शेतीविषयक आयोजित शिखर परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. कृषी आणि अन्न प्रक्रियेशी संबंधित झीरो बजेट नैसर्गिक शेतीसह विविध विषयांवर त्यांनी यावेळी विचार व्यक्त केले. तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेती यांचा मेळ विकासाची नवी दिशा देणारा आहे. देशातले ८ कोटीपेक्षा जास्त शेतकरी नैसर्गिक शेतीच्या चळवळीशी जोडले गेले आहेत. याचा फायदा देशभरातल्या शेतकऱ्यांना होईल, असं त्यांनी सांगितलं. शेतीच्या नवनविन पद्धती शोधल्या पाहिजेत. रसायनांना पर्याय शोधले पाहिजेत, असं ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या परिषदेला संबोधित केलं. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या दृष्टिकोणानुसार सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी तसंच शाश्वत यंत्रणा, खर्चात कपात, बाजारपेठा, आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला भाव, ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर तसंच गुजरात आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.