भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय फळांवर अमेरिकेच्या बाजारात बंदी नसून केळी, डाळिंब, आंबा, कलिंगड आणि नारळ या सर्व भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. कोविड -१९ मुळे भारतामधून आंबा आणि डाळिंबाच्या निर्यातीवर  बंदी घालण्यात आली होती, मात्र २३ नोव्हेम्बर रोजी झालेल्या १२ व्या भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचावर अमेरिकेनं भारतीय डाळिंबाला अमेरिकेत प्रवेश द्यायला मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं. भारतातल्या  कारली आणि वांगी या भाज्यांवर देखील अमेरिकेत बंदी नसून २०१९-२० मध्ये ७२ कोटी ५७ लाख अमेरिकी डॉलर्स तर २०२०-२१ मध्ये १०१ कोटी २५ लाख अमेरिकी डॉलर्स किमतीच्या भाज्यांची निर्यात भारतामधून अमेरिकेत झाल्याचं ते म्हणाले.२०२१-२२ च्या उसाच्या गाळप हंगामात इथेनॉल उत्पादनामधून १८ हजार कोटी रुपयांहून  जास्त महसूल जमा होण्याची शक्यता असल्याचं गोयल यांनी आज लोकसभेत  सांगितलं. इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना वेळेवर उसाचा मोबदला मिळेल असं ते म्हणाले.