ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या ३ गावांच्या पुनर्वसनासाठी तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या रानतळोधी आणि कोळसा या दोन आणि लगतच्या कारवा गावाचं पुनर्वसन करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन विभागाच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. त्या भागात मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली.

राज्यातली वाघांची संख्या आणखी वाढणार हे गृहीत धरून आतापासूनच त्यावर मार्ग काढणं,उपाययोजना करणं गरजेचं आहे तरच पुढील काळात आपण हा संघर्ष टाळू शकतो. त्यासाठी व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्यांच्या जवळच्या गावांचे आवश्यकतेनुसार पुनर्वसन करण्यात यावं. शक्यतो गावकऱ्यांना रोखीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. उघड्या विहिरीत वाघ तसंच अन्य प्राणी पडून त्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना अलीकडील काळात घडल्या आहेत.

अशा घटना रोखण्यासाठी त्या भागातील विहिरींना संरक्षण भिंत बांधणे आणि अन्य उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रात  वाघांची संख्या वाढत असून ती  ३१२ इतकी  झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचं प्रमाण सर्वाधिक आहे.