राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेनं काल नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार शहरातल्या सर्व समुद्र किनाऱ्यांवर  ३० एप्रिल पर्यंत प्रवेश बंदी राहाणार आहे. त्याचप्रमाणे ज्या इमारतींमध्ये एकाच वेळेस पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास त्या निवासी सोसायटीला १० हजार रुपये दंडही लावण्यात येणार आहे. लागोपाठ हे घडल्यास सोसायटीला २० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

गृहविलगीकरणात असलेले रुग्ण बाहेर फिरतांना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येणार असून  परदेशातून येणाऱ्या नागरिकांना ७ दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. अनेक जण विलगीकरणातून पलायन करत असल्याचे आढळून आल्यामुळे महानगर पालिकेने या सूचना जारी केल्या आहेत. या सूचना त्वरित अंमलात येणार आहेत असंही महानगरपालिकच्या वतीने सांगण्यात आलं आहे.