‘आंग्रे घराण्याचा इतिहास’ पुस्तकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज अशा परकीय सत्तांना आपले दस्तक (परवाने) घेण्यास बाध्य करणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आंग्रे घराण्याचा इतिहास असलेल्या ‘कुलाबकर आंग्रे सरखेल : आंग्रे घराण्याचा इतिहास’ या पुस्तकाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले.
महाराष्ट्राला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला असून हा इतिहास हिंदी भाषेत भाषांतरित झाल्यास सर्व देशाला त्याचा लाभ होईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
दामोदर गोपाळ ढबू यांनी लिहिलेले हे पुस्तक प्रथम 1939 साली प्रसिद्ध झाले होते. या पुस्तकाचे पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. प्रकाशन सोहळ्याला कान्होजी आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे, भैरवीराजे आंग्रे, चंद्रहर्षा आंग्रे, आंतरराज्य छात्र जीवन दर्शन प्रकल्पाचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या पुस्तकात मराठा आरमाराचा 150 वर्षांचा इतिहास, आंग्रे कालखंडातील समाज जीवन, न्यायव्यवस्था, नौकाबांधणी, व्यापार, युद्धजन्य परिस्थिती, अंतःकलह आदी घटनांचा उहापोह करण्यात आला असल्याची माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी यावेळी दिली.
पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे पुनर्लेखन व संपादन दीपक पटेकर, संतोष जाधव व अंकुर काळे यांनी केले असून श्री समर्थ सेवा प्रकाशन, नाशिक यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.