राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी असल्याचे आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यानं कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावलं उचलली, त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी आहे. आरोग्य विभागाच्या प्रसिद्धिपत्रकात ही माहिती दिली आहे. अशा राज्यांची २ आणि ३ फेब्रुवारीची आकडेवारी या पत्रकात दिली आहे. त्यानुसार पॉझिटीव्ह रुग्ण संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात ६ वा, दर दश लक्ष लोकसंख्येत मृत्यूच्या प्रमाणाबाबत चौथा, आणि कोरोनाच्या वाढत्या दराचा विचार केला तर सहावा होता.
अॅक्टीव्ह रुग्णाबाबत महाराष्ट्रात दर दशलक्ष लोकसंख्येत २९० रुग्ण असताना केरळमध्ये २ हजारपेक्षा जास्त अॅक्टीव्ह रुग्ण आज आहेत.महाराष्ट्रात, विशेषत: मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांत इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीपासूनच कितीतरी जास्त आहे. शिवाय लोकसंख्येची घनता आणि शहरीकरण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. असं असूनही दर दश लक्ष लोकसंख्येत दररोज आढळणारे कोविड रुग्ण, बरे होऊन जाणारे रुग्ण आणि त्या तुलनेत कमी होत असलेले मृत्यू याची सांगड घातली, तर महाराष्ट्रानं उचललेल्या पावलांमुळे कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आल्याचं दिसतं, असं या पत्रकात म्हटलं आहे.मुंबईतल्या दाट लोकवस्ती असलेल्या धारावीसारख्या भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं ज्या उपाययोजना राबवून त्या भागातला संसर्ग रोखला, त्या धारावी पॅटर्नची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. अन्य राज्यांनी देखील त्याचा अवलंब करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं केल्या.
महाराष्ट्राने कोरोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्याची दखल वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाईम्ससारख्या जागतिक माध्यमांकडून घेतली गेली. मुंबईत जम्बो कोविड सेंटर्स काही दिवसात उभारली गेली, बीकेसीतल्या मैदानावर १५ ते २० दिवसात आयसीयू सुविधा असलेलं जम्बो कोविड सेंटर उभारलं गेलं, या बाबींकडे ही या पत्रकात लक्ष वेधलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.