युवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकासात युवकांचं योगदान महत्त्वाचं असून युवकांनी देशासाठी धैर्य आणि निष्ठेनं काम करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. आसाममधल्या तेजपुर विद्यापीठाच्या १८ व्या दीक्षांत कार्यक्रमात ते दुरदृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्याना उद्देशून बोलत होते.

तेजपुर विद्यापीठाची पाळेमुळे इतिहासात रूजली असून ईशान्येकडील राज्यांच्या क्षमतेवर देशाला विश्वास असल्याचं मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं. तसंच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आसामच मोठं योगदान राहिल्याच मोदी यांनी यावेळी सांगितले.

आपल्याला आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आवश्यक असून कठीण परिस्थितीत पराजयाचा विचार न करता विजयासाठीच प्रयत्न केले पाहिजेत. सर्वसामान्यांसाठी देशात अनेक योजना राबविण्यात येत असून आसामलाही त्याचा मोठा फायदा झाला असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यंच शिक्षण पूर्ण झाल्यावर ते देशाच्या उन्नतीचा विचार करून देशाला नवीन उंचीवर घेवून जातील याची खात्री असल्याचं मोदी म्हणाले.आसामचे राज्यपाल ,मुख्यमंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्री यावेळी उपस्थित होते. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मर्यादित विद्यार्थ्याना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली.