दहावी आणि बारावीच्या परीक्षा २३ आणि २९ एप्रिलपासून

 

मुंबई (वृत्तसंस्था) : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अनुक्रमे,येत्या २३ आणि २९ एप्रिलला घेण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुंबई इथं केली.त्या मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होत्या.

गायकवाड पुढे म्हणाल्या, इयत्ता १२ वी ची प्रात्यक्षिक परीक्षा १ एप्रील ते २२ एप्रिल दरम्यान होणार असून लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ या दरम्यान घेण्यात येईल.या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ९ एप्रिल ते २८ एप्रिल या दरम्यान होतील तर लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्यात येतील. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

कोविड-१९ च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसंच आरोग्य विभागानं वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश अवलंबून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.