‘विकसित भारत संकल्प’ यात्रेला ग्रामीण भागात १ लाख १४ हजार नागरिकांची भेट

 

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागाळातील नागरिकांना पोहचविण्याच्या दृष्टिने सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत असून २४८ ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात १ लाख १४ हजार नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभदेखील देण्यात आला.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे. यात्रेच्या माध्यमातून ७९ आयुष्मान कार्ड, ७० भूमी अभिलेख दाखले, ‘हर घर जल' च्या २८ जोडण्या देण्यात आल्या. याशिवाय ६८ ओडीएफ शौचालय, ७५ मृदा आरोग्य कार्ड, १२० उज्वला गॅस, ४२३ सुरक्षा विमा योजना, २५८ पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, ७४ आयुष्मान कार्ड इत्यादी योजनेचा लाभ देण्यात आला.

आरोग्य शिबिराअंतर्गत २० हजार १४२ नागरिकांची तपासणी, ५ हजार ३७० क्षय रोग तपासणी, ३ हजार ६६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. १ हजार ८३२ खेळाडू, ६ हजार ६२६ विद्यार्थी, १ हजार ४४८ स्थानिक कलाकार आणि १७ हजार ४३४ महिलांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.

विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे. यात्रेद्वारे ११६ शेतकऱ्यांशी नैसर्गिक शेतीविषयी संवाद साधला. ११ लाभार्थ्यांना शौचालय प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी ४५ हजार ६९७ नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला.

विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने केले आहे.