इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं पालकत्व

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इर्शाळवाडी दुर्घटनेत वाचलेल्या अनाथ मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं असल्याची माहिती राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी काल दिली. नढळ इथल्या तात्पुरत्या निवाऱ्यात, दुर्घटनेतल्या पीडितांना दिलेल्या भेटीदरम्यान गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी मध्ये १ ते १८ वयापर्यंतची एकंदर ३१ मुलं मुली असून ,त्यापैकी काही आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

आश्रमशाळेतल्या एका विद्यार्थ्याचा ठावठिकाणा लागला नसून, इतर सर्व मुले सुखरुप असल्याचं आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितलं. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं इर्शाळवाडी दुर्घटनेतल्या अनाथ मुलांचं पालकत्व स्वीकारलं आहे. ही मुले १८ वर्षाची होईपर्यंत त्यांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी संस्थेनं घेतली असून,मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत मदत कार्य सुरू राहील,असा विश्वास यावेळी दुर्घटनाग्रस्त मुलांना देण्यात आला.

रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी इथल्या दुर्घटनेतल्या बळींची संख्या २७ वर पोहोचली आहे. आपत्ती व्यवस्थापन दलाच्या चार तुकड्या ढिगारा उपसण्याचं काम अजूनही करत असून, कोसळणारा पाऊस आणि दुर्गंधी यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत.