देशात 5 वर्षात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आल्याचा नीती आयोगाचा अहवाल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात 2015-16 ते 2019-21 या कालावधीत दारिद्र्यात जीवन कंठणाऱ्या नागरिकांचं प्रमाण घटलं असून या काळात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आले आहेत. नीती आयोगानं काल प्रकाशित केलेल्या राष्ट्रीय बहुमितीय दारिद्र्य निर्देशांकातून ही बाब समोर आली आहे. गरीब लोकांचं प्रमाण 24 पूर्णांक 85 शतांश टक्क्यांवरून आता 14 पूर्णांक 96 शतांशावर आलं आहे. हा निर्देशांक 2015-16 आणि 2019-21 मध्ये करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाच्या कालावधीत देशानं दारिद्र्य निर्मूलनाच्या विविध निकषांमध्ये केलेली प्रगती दर्शवतो.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात गरीबीचं प्रमाण अधिक म्हणजे जवळपास 33 टक्क्यांनी घटलं आहे, अशी माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना दिली.  देशानं ठरवलेली शाश्वत विकासाची उद्दीष्टं निर्धारित कालावधीच्या आधीच म्हणजे 2030 पूर्वीच पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. उत्तर प्रदेशात गरीबांच्या संख्येत मोठी घसरण झाली असून त्याखालोखाल बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांचा क्रमांक आहे.