संविधानाची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांनी त्याचं पावित्र्य राखण्याची जबाबदारीही घ्यायला हवी - शरद पवार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : संविधानाची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांनी त्याचं पावित्र्य राखण्याची जबाबदारीही घ्यायला हवी, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. संविधानात राज्यपाल ही एक संस्था असून, त्याची अप्रतिष्ठा कशी केली जाते याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रानं पाहिल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, नैतिकता आणि भाजपाचा काही संबंध आहे, असं वाटत नसल्याची टीका पवार यांनी केली. सत्तेचा गैरवापर सातत्यानं केला जात असून, आपण त्या विरोधात लढणार असल्याचं ते म्हणाले. देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असून, विरोधकांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. सध्या  मिळून काम करणं हे जास्त महत्वाचं असून, चेहरा नंतर ठरवला जाईल अशी आपली भूमिका पवार यांनी स्पष्ट केली.