प्राध्यापक जी एन साईबाबा आणि इतरांना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा तसंच इतरांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं, स्थगिती दिली आहे. या प्रकरणाचा फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालयाला स्वतंत्र पीठ स्थापन करायला सांगितलं आहे. बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायद्यांतर्गत साईबाबा आणि इतर पाच जणांना ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यासाठी परवानगी देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर, न्यायमूर्ती एम आर शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. नागपूर पीठानं यापूर्वी दिलेल्या निर्णय बाजूला ठेऊन, योग्य आणि कायद्यानुसार या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश पीठानं उच्च न्यायालयाला दिले आहेत.