राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात कोळसा वापरावर पूर्ण बंदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये कोळशाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून कोळसा यापुढे परवानगीयोग्य इंधन मानले जाणार नसल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयानं दिली आहे. हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने कोल इंडिया लिमिटेडला  आणि हरियाणा ,उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारांना राजधानी क्षेत्रांमध्ये कार्यरत पुरवठादारांना कोळशाचे वाटप न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोळसा आणि फर्नेस ऑइलसह अत्यंत प्रदूषित जीवाश्म इंधनांच्या उत्सर्जनामुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. पंरतु औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून सर्व क्षेत्रातील विविध कामांसाठी कोळशाचा वापर आणि इतर मंजूर नसलेले इंधन पूर्णपणे काढून टाकण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत.