राज्याचा सायबर गुप्तचर विभाग स्थापन करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे ,या पुढच्या काळात अशा गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी राज्याचा सायबर गुप्तचरविभाग स्थापन केला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानपरिषदेत केली. शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. राज्याचा सायबर विभाग बळकट केला जात असून, आधुनिक उपकरणं या विभागाकडे आहेत, आणि मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याचं काम सुरू आहे. दरवर्षी तंत्रज्ञान बदलत असतं हे लक्षात घेऊन या विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञान सेवा आऊटसोर्स करण्याचा विचार आहे, असं फडनवीस यांनी सांगितलं.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी समाजमाध्यम, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर मोठी जनजागृती मोहीम राबवली जाईल. पायरसीवर आणि मॅट्रिमोनी संकेतस्थळांवरून होत असलेल्या फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना आणि यंत्रणा तयार करण्याचा विचार केला जाईल असं फडनवीस म्हणाले. ही यंत्रणा केंद्र सरकारच्या व्यवस्थेशी अधिक चांगल्या प्रकारे कशी जोडता येईल यादृष्टीने काम करणार असल्याचं ते म्हणाले. कर्जविषयक फसवणुकीशी संबंधित अनेक लोन एप ही नेपाळमधून चालवली जात असल्याचं आढळून आलं आहे, यावर राज्याच्या सायबर वॉचच्या माध्यमातून कारवाई केली जात असून, केंद्र सरकार आणि नेपाळ सरकारला याविषयी महिती दिली आहे, असं ते म्हणाले.