गडचिरोली जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत देण्याची अजित पवार यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, निकष बाजूला ठेवून हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत शासनानं द्यावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते आज पूर स्थितीची पाहणी करण्यासाठी गडचिरोलीत गेले होते. त्यांनी शिवणी गावात जाऊन, पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.

त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. केवळ शेतकऱ्यांचं आधारकार्ड आणि अर्ज घेतले जात आहेत. पंचनामे झाल्याशिवाय मदत कशी मिळणार, असा प्रश्न त्यांनी केला. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या व्यथा सरकारपर्यंत तत्काळ पोहचल्या असत्या. शिवाय त्यांना मदतही मिळाली असती. मुंबईत बसणं आणि पालकमंत्री नेमून काम करवून घेणं यात फरक आहे, अशी टीका पवार यांनी केली.

तेलंगणातल्या मेडिगड्डा प्रकल्पाचा सिरोंचा तालुक्याला मोठा फटका बसला. याबाबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी, प्रसंगी केंद्र सरकारनंही हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. हा प्रश्न आपण विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचं अजीत पवार यांनी सांगितलं.