नव्या कृषी कायद्यामुळे कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल - नरेंद्र सिंह तोमर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या सदस्यांशी चर्चा करताना ते बोलत होते.

या कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक बदल केले असून, भारतीय कृषी क्षेत्रात एक नवा अध्याय जोडला जाईल, असे ते म्हणाले. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल, उद्योगांना चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

या कायद्यानंतरही शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळत राहील, असे आश्वासन देतानाच तोमर यांनी, सरकार विविध मुद्यांवर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार केला.